गोगलगायीग्रस्तांना शासनाकडून 98 कोटींची मदत; पहा कोणत्या जिल्ह्याला किती मिळणार भरपाई ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी खरीप हंगामाची सुरुवात कोरड्याने झाली. जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वावरात पिके अंकुरित असतानाच पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अख्खी पिके नष्ट झाली. हा प्रादुर्भाव बीड, उस्मानाबाद आणि लातूर या भागात जास्त झाला होता. मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात खरीप हंगामात गोगलगायीनी नुकसान केलेल्या पिकांना विशेष अनुदान देण्याबाबत सरकराने आदेश काढला आहे. गोगलगायीग्रस्तांना ९८ कोटी ५८ लाख रुपयांची मदत सरकार कडून मिळणार आहे. पावसाळी अधिवेशनापासून गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत होती. अखेर सरकारने तीन जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी मदत देण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक ९२ कोटी ९९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत

यंदाच्या हंगामात राज्यात अंदाजे ४८.७६ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाल्याचा अंदाज आहे. मागील वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने लागवडीखालील क्षेत्र दोन लाख हेक्टरहून अधिक वाढले आहे. मात्र यंदा अतिवृष्टी आणि गोगलगायीचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीनला तडाखा बसला आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. सरकारी यंत्रणेने पंचनामे केल्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषात बसत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे. सरकारने नुकत्याच केलेल्या वाढीनुसार १३ हजार ३०० रुपयेप्रमाणे प्रति दोन आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येणार आहे.

कुणाला किती  ?

–लातूर जिल्ह्याला दोन हेक्टरपर्यंत बाधित ९२ हजार ६५२ शेतकऱ्यांच्या ५९ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रासाठी ८१ कोटी २७ लाख, ८४ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
–बीडमधील १२ हजार ९५९ शेतकरी या निकषात बसत असून, ३८२२. ३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यापोटी ५ कोटी १९ लाख ८४ हजार,
–उस्मानाबादमधील ४०१ शेतकऱ्यांना २८३. ८३ हेक्टर क्षेत्रासाठी ३८ लाख सहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
लातूरमधील तीन हेक्टरच्या मर्यादेच्या निकषातील १२ हजार ९८४ शेतकऱ्यांच्या ८६२०.७० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ११ कोटी ७२ लाख, ४२ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

अशी मिळणार मदत

बाधित शेतकरी – क्षेत्र – मदत (लाखांत)
बीड : १२९५९ – ३८२२- ५१९. ८४
लातूर : ९२६५२- ५९७६४-८१२७.९४
उस्मानाबाद : ४०१-२८.३-३८.६

(दोन ते तीन हेक्टर)
लातूर : १२९८४-८६२०.७०- ११७२.४२

फेरसर्वेक्षण करण्याची मागणी

बीड जिल्ह्यात १४ हजार हेक्टरपेक्षा क्षेत्र बाधित आहे, तरीही केवळ ३८२२ हेक्टर क्षेत्र बाधित दाखवले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात केवळ दोन कोटी ५९ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. सरकार अर्धवट माहिती समोर आणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. त्यामुळे या क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

 

error: Content is protected !!