हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी,कराड
जयवंत शुगरचा कारखान्याला ऊस पोहचविणाऱ्या ट्रक्टरला आग लावण्यात आली आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील ऊस दराचे आंदोलन पेटले. आज अनेक संघटना फडात जाऊन ऊस तोड बंद करणार असल्याची माहिती आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गेल्या काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठकी घेतल्या होत्या. तसेच सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने हे शेजारील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांपेक्षा कमी दर देत आहेत, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इंदोली येथे जयवंत शुगरला घेवून जाणाऱ्या ट्रक्टरला पेटविल्याची घटना घडली. यामध्ये ट्रक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची माहिती उंब्रज पोलिस माहिती घेत असून अद्याप तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. उंब्रज पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष यांना ताब्यात आहे. पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ऊसतोड आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.