Agriculture Electricity : ‘या’ राज्यात शेतकऱ्यांना वीज बिलाच्या थकबाकीत 80 टक्के सूट!

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी विजेची (Agriculture Electricity) समस्या भेडसावत आहे. मुबलक प्रमाणात वीज मिळत नसतानाच आता उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना वीज बिलाच्या थकबाकीत 80 टक्के सूट देण्यात आल्याचे समोर आले आहे. याशिवाय शेतीच्या सिंचनासाठी 10 तास वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. उत्तरप्रदेशचे ऊर्जामंत्री ए.के. शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. उत्तरप्रदेशच्या ऊर्जामंत्र्यांनी (Agriculture Electricity) शक्तीभवन येथे ओटीएस, आरडीएसएस आणि व्यवसाय योजनेचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी वीज पुरवठ्यात (Agriculture Electricity) कोणतीही कमतरता भासू नये, अशा सूचना युपी सरकारने दिल्या आहेत. त्यासाठी विहित वेळापत्रकानुसार सिंचनासाठी 10 तास वीजपुरवठा देणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांची वेळेनुसार वीज पुरवठ्याची विशेष मागणी असते. त्याचीही काळजी घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी देताना आणि वीज पुरवठा करताना कोणतीही हलगर्जीपणा करू नये, अशी ताकीदही वीज मंडळ अधिकाऱ्यांना उत्तर प्रदेशच्या ऊर्जा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तडजोडीच्या वन टाईम सेटलमेंट म्हणजे ओटीएसच्या तिसऱ्या टप्प्यात 1 किलोवॅट पर्यंतचे छोटे घरगुती ग्राहक आणि शेतकर्‍यांना थकबाकीवरील अधिभारामध्ये 80 टक्के सूट दिली जाणार आहे.

तडजोड योजनेला प्रतिसाद (Agriculture Electricity For UP Farmers)

ऊर्जामंत्री ए.के. शर्मा म्हणाले की, लोकांचा ओटीएसकडे वाढता कल आहे. याच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी अजून प्रयत्नांची गरज आहे. ही आतापर्यंतची सर्वात जास्त काळ चालणारी ओटीएस योजना आहे. 31 डिसेंबर 2023 नंतर ज्या ग्राहकांची थकबाकी शिल्लक आहे किंवा ज्यांची वीज चोरी प्रकरणे निकाली निघू शकत नाहीत. अशा ग्राहकांवर कारवाई केली जाईल. बड्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी मुख्यालय, डिस्कॉम, प्रादेशिक व जिल्हास्तरीय कार्यालयातूनही प्रयत्न करावेत, असे निर्देश शर्मा यांनी दिले आहे. विशेषत: निगरगट्ट थकबाकीदारांवर विशेष लक्ष द्यावे लागेल.

34 लाख शेतकऱ्यांना लाभ

उत्तरप्रदेशमधील चारही भागांमध्ये प्रामुख्याने या योजनेचा लाभ मिळणार आहे. ओटीएसच्या दोन टप्प्यांत पूर्वांचलमधील 9 लाख 30 हजार शेतकरी, मध्यांचलमध्ये 9.25 लाख, दक्षिणांचलमध्ये 7.13 लाख, पश्चिमांचलमध्ये 7.12 लाख आणि केस्कोमधील 20 हजार शेतकऱ्यांनी ओटीएसमध्ये नोंदणी केली आणि अधिभार सवलतीचा लाभ घेतला. तसेच वीज चोरीच्या प्रकरणात पूर्वांचलमध्ये 18 हजार, मध्यांचलमध्ये 11 हजार, दक्षिणांचलमध्ये 18 हजार, पश्चिमांचलमध्ये 21 हजार आणि केसकोमध्ये 1350 जणांनी ओटीएसचा लाभ घेऊन आपली प्रकरणे संपवली आहेत.