Agriculture News : सध्या राज्यात पावसाने चांगलीच दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. काही ठिकाणच्या शेतकऱ्यांकडे विहिरीमध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे ते पाणी देऊन शेतकरी पीक जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना ते देखील करण्यात अडचण निर्माण होत आहे. दरम्यान वर्धेच्या आर्वी आणि आष्टी तालुक्यामध्ये अनिकेत शिवारातील वीजपुरवठा मागच्या काही दिवसापासून खंडित झाला आहे. शेतकऱ्यांनी महावितरणाकडे विनंती करून देखील हा प्रश्न सुटला नसल्याने शेतकरी चक्क रस्त्यावर उतरले आहेत.
संतापलेल्या शेतकऱ्यांनी आष्टी जवळच्या आनंदवाडी भारसवाडा या रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले आहे. शेतीतील पिक करपू लागली असून मागच्या तीन दिवसापासून वीज पुरवठा बंद असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. लवकरात लवकर पाणी दिले नाही तर खरीप पिक वाया जाईल मात्र पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही. त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क स्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले आहे.
पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर
ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून राज्यात पाऊस गायब झाला आहे. मागच्या 30 दिवसापासून कुठेही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिक वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. पाऊस नाही पण विहीर आणि बोर मध्ये जे काही पाणी आहे त्यावर शेतकरी पिक वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्येच महावितरणाकडून लोड शेडिंग सुरू करण्यात आलं असून अपूर्ण होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध असलेलं पाणी देखील पिकांना देत नाही. त्यामुळे विजेचा अनियमित विद्युत पुरवठा होत असल्यामुळे पाणी असून देखील काही शेतकरी पिकांना वाचवू शकत नसल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
विजेची मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण
सध्या कमी पडलेला पाऊस आणि विजेची वाढलेली मागणी याचा सर्वात जास्त फटका राज्याला बसत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लोड शेडिंगचे संकट देखील घोंगावत आहे. महाराष्ट्राला आता लोड शेडिंगचा फटका बसणार असून मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात इमर्जन्सी लोड शेडिंग करण्यात आल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विजेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागणार असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे महावितरणाकडून लोड शेडिंग सुरू आहे.