हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येऊ नये, यासाठी धरणातील विसर्ग करताना सतर्क राहा. आलमट्टी धरणातील (Almatti Dam) विसर्गाबाबतही समन्वय ठेवा. आंतरराज्य बैठक घेऊन विसर्ग करण्याबाबत निर्णय घ्या, जेणेकरून महापूर नियंत्रणात राहील’, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रशासनाला दिल्या आहेत. राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत (Almatti Dam) आज मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
समन्वय ठेवण्याचे आदेश (Almatti Dam Water)
यंदाच्या वर्षी राज्यात मॉन्सूनची स्थिती चांगली असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक असेल. अशा वेळी महापुराची स्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवा. कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घ्या. अलमट्टी धरणावर (Almatti Dam) एक जलअभियंत्याची नियुक्ती करा. राज्यातील धरणातून विसर्ग करताना समन्वय ठेवा. महापुराची स्थिती उद्भल्यास निवारा केंद्रे सर्व सुविधांनी सज्ज ठेवा. पूरग्रस्तांना चांगले अन्न, औषधे यांची व्यवस्था करा. जनावरांना चारा कमी पडणार नाही, याची काळजी घ्या. अशा सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या आहेत.
भूस्खलन होणाऱ्या भागांची माहिती घ्या
मॉन्सून काळात पुराची तीव्रता वाढल्यास तातडीने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करा. एनडीआरएफ पथके तैनात करा. विद्युतपुरवठा आणि दूरध्वनी व्यवस्था ठप्प होणार नाही, यासाठी उपाययोजना करा. महापुराच्या काळातही पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहील, याचीही खबदरारी घ्या. ज्या गावांना, नागरी वस्तींना भूस्खलनाचा धोका आहे, त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करा. असेही त्यांनी या बैठकीत म्हटले आहे.
स्थलांतरितांसाठी यंत्रणा सज्ज ठेवा
पूरग्रस्त गावांमधील नागरिकांना योग्य वेळी सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्या. असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीला कोल्हापुरातून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह इतर जण उपस्थित होते.