हॅलो कृषी ऑनलाईन : सदोष आहारामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. असा सदोष चारा खाल्यामुळे जनावरांमध्ये चयापचयाचे आजार दिसून येतात. त्याचा जनावरांच्या दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. जनावरांचे खाद्य ज्या ठिकाणी साठवून ठेवले आहे, तेथे पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी, कारण खाद्य ओले झाल्यास बुरशी लागते. आजच्या लेखात आपण सदोष चाऱ्यामुळे जनावरांना होणाऱ्या आजाराविषयी जाणून घेऊया…
१) ग्रास टेटॅनी
जनावरे कुरणामध्ये चरायला गेल्यावर जास्त प्रमाणात कोवळे हिरवे गवत मोठ्या प्रमाणावर खातात, त्या वेळी हा आजार उद्भवतो. रक्तातील मॅग्नेशियम क्षाराच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. अतिरिक्त पोटॅशियम आणि सायट्रिक ॲसिड यामुळे हा आजार होतो. लक्षणे लवकर दिसून येत नाहीत, परंतु ग्रास टेटॅनीमुळे जनावराच्या शरीराचा तोल जातो, जनावर अस्वस्थ असते. शरीराला आकडी येते, जनावर डोके खाली पाडते. जनावर कोमात जाऊन मृत्यू होतो.
उपाय : पावसाळ्यात जनावरांच्या आहाराची योग्य काळजी घेतल्यास हा आजार टाळता येतो.
२) जठराचा दाह
पावसाला सुरवात झाली की कुरणावर चरणाऱ्या जनावरांना हिरवे गवत भरपूर प्रमाणात उपलब्ध होते, ते अधाशीपणाने चारा खातात, चाऱ्यात असणारे काही विषाणू आणि कृमी पोटात संसर्ग करून जठराचा दाह निर्माण करतात. एकदम जास्त धान्य, पीठ अथवा मऊ खाद्य खाल्ल्यामुळे अपचन होते. त्यामुळे जठरात निर्माण होणाऱ्या पाचक रसात अनैसर्गिक बदल होतात. नेहमीच्या चारा पाण्यात अचानक केलेला फेरबदल हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. रासायनिक खते, फवारणी केलेला चारा सेवन केल्यामुळे पोटाच्या आतील स्लेश्म आवरणास इजा, जखमा होतात. बाधित चारा खाल्ल्यामुळे जिवाणूंचा संसर्ग होतो. जनावरांना कॅल्शिअम, फॉस्फरससारख्या सूक्ष्म घटकांची, जीवनसत्त्वांची कमतरता असेल, तर ते दगड, माती, विटा, मेलेल्या जनावरांची हाडे, प्लॅस्टिक व कागद गिळतात.
अपचनामुळे बद्धकोष्ठता होते, पोटात चारा घट्ट होऊन पोटाची हालचाल थांबते, जनावर रवंथ करायचे थांबते, जनावरांना बद्धकोष्ठता झाल्यामुळे चारा खात नाहीत, पोटदुखीची लक्षणे दाखवितात. आंत्राविषार आजाराचे जिवाणू या जनावरांच्या पोटात वाढतात, त्यामुळे त्यांना हगवण लागते.
उपाय : जठराचा दाह होऊ नये, तसेच अपचन झालेले असल्यास जनावरांचा चारा, पाण्यातील केले जाणारे फेरबदल टाळावेत. जनावरे अखाद्य वस्तू खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. अपचनात रेचक देऊन पचनसंस्थेतील अडसर दूर करावा. पचन पूर्ववत होईपर्यंत जनावरांना पचनास हलके आणि काहीसे कमी आणि भरड खाद्य द्यावे. पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.