हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यंदाचा गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून चाळीसगाव बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतमाल मोजण्यासाठी भुईकोट्यावरील फी असते ती माफ करण्याचा निर्णय बाजार समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. येत्या गुढीपाडव्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपला कृषिमाल विकण्यासाठी येतात. यावेळी शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनाचे आणि शेतीच्या मालाचे देखील वजन केले जाते. यासाठी शेतकऱ्यांना किमान 50 आणि त्यापेक्षाही अधिक रक्कम मोजावी लागते. मात्र आता ही जबाबदारी बाजार समितीने घेतली आहे. त्यामुळे बाजार समितीचे सहा लाखांचे उत्पन्न घटले असले तरी त्याचा ताण मात्र शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून अशाप्रकारे फी माफीचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे बाजार समितीचे सहा लाखांचे उत्पन्न मिळणार नाही मात्र प्रशासन यामधील सर्वांच्या मंजुरीनंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय त्यामुळे शेतमाल विक्री पूर्वी जी रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती ती आता येत्या गुढीपाडव्यापासून म्हणजेच 2 एप्रिल पासून घेतली जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.