हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन स्तरावरून योग्य मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शेती, ग्रामविकास व इतर खात्यांशी संबंधित समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
योजनांना गती देण्यासाठी बैठका
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान, पशुधनाची झालेली हानी, घरांची पडझड, खरिपातील पिकांची स्थिती, पीक कर्जवाटप, सिंचन व्यवस्था या सर्वच मुद्द्यांचा आढावा आम्ही घेतला आहे. पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, लवकरात लवकर योग्य ती मदत देण्याचा प्रयत्न सरकारचा राहील. राज्यातील विविध योजनांसाठी निधी देण्याची तयारी केंद्राची आहे. केंद्राच्या योजनांचा फायदा होण्यासाठी केंद्राशी निगडित योजनांमधील समस्यांचा आढावा घेण्यात आला आहे. आम्हाला राज्याच्या विकासविषयक सर्वच योजनांना गती द्यायची आहे. त्यामुळे मी विभागीय बैठका घेतो आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
राज्यात पूरस्थिती असताना आपण सत्कार स्वीकारण्यात दंग आहात अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे याबाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले, ‘‘प्रत्यक्ष अतिवृष्टी व पूर सुरू असताना मी व स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भाचा दौरा केला. लष्कराचे हेलिकॉप्टर नेण्यास अडचण असल्याचे लक्षात येताच आम्ही रस्ते मार्गे पूरग्रस्तांच्या भेटीला गेलो. मी थेट गडचिरोलीच्या भागात फिरलो तर भंडारा, गोंदिया, अमरावतीला उपमुख्यमंत्री गेले होते,’’ असे मुख्यमंत्री उत्तरले.