हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्याही लांबल्या आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यात रब्बीच्या केवळ १५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. पेरणीला उशीर झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गहू, हरभरा, मका, ज्वारी या रब्बी पिकांची पेरणी पावसाळा संपल्यानंतर केली जाते. मात्र यंदा परतीचा पाऊस जास्त काळ राहिला. लांबलेला पाऊस आणि परतीच्या पावसामुळे कापूस, मका, ज्वारी, सोयाबीनची काढणी लांबणीवर पडली आहे. तसेच, परतीच्या पावसामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहिल्याने नांगरणीच्या कामांना विलंब होत आहे, ज्यामुळे या वर्षी राज्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बाजरीची ३ हजार हेक्टर, गहू २ हजार हेक्टर, मका ३ हजार हेक्टर आणि हरभऱ्याची ९०० हेक्टरवर लागवड झाली आहे. उर्वरित रब्बी क्षेत्रातील पेरण्या लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
मजुरांची कमतरता
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक उद्ध्वस्त झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे खरीप पिकांच्या काढणीच्या वेळी अनेक जिल्ह्यांमध्ये मजुरांची कमतरता आहे. पिकांची काढणी करणे हे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. सध्या मजूर मिळत नसल्याने शेतकरी पिकांची काढणी करू शकत नाहीत. जिल्ह्यातील शेतकरी शेतीच्या कामासाठी मजुरांच्या शोधात आहेत. जिल्ह्यातून मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
जिल्ह्यात खरीप हंगामात कापसाखाली मिरचीचे पीक घेतले जाते. परतीच्या पावसाने कापूस व मिरचीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसात मिरची आणि कापूस मिसळत असल्याने शेतकरी कापूस वाचण्यात मिरची काढण्याच्या तयारीत आहेत. काढणीसाठी मजूरच मिळत नसल्यामुळे शेतकऱयांची पिके खराव होत आहेत. शिवाय सध्या बाजारात म्हणावे तसे भाव नसल्यामुळे देखील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.