हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उच्च शिक्षित असूनही म्हणावी तशी नोकरी तरुणांना मिळत नाही. अशातच काही असे तरुण आहेत ज्यांनी नोकरीची अपेक्षा न ठेवता व्यवसाय सुरु केला आणि आता ते चांगला नफा कमावत आहेत. आज आपण अशाच एका यशस्वी तरुणाची गोष्ट पाहणार आहोत.
उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील असई गावातील रहिवासी असलेल्या आशुतोष दीक्षितने 2017 मध्ये प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालय PSIT, कानपूर येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. पदवीनंतर 1 वर्ष पूर्ण होऊनही त्याला नोकरी मिळाली नाही. मात्र, त्यानंतरही आशुतोषने हार मानली नाही. तो गावी परतला आणि त्यांने पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला. राजस्थानातील बिकानेर येथून चार सहिवाल जातीच्या गायी खरेदी करून आणल्या आणि पाहता पाहता तीन वर्षात ७० गायीची गोशाळा त्याने उभारली. आता शेकडो लिटर दूध काचेच्या बाटल्यांमध्ये भरून शहरात पाठवल्या जातात. दुग्ध व्यवसायातून हा तरुण महिन्याकाठी 1 लाख रुपये कमावतो.
आशुतोषने सांगितले की, त्याचे गाव हे जंगलाशेजारी असल्यामुळे त्याला भरपूर प्रमाणात चाऱ्याची उपलब्धता होते. त्याच्या गोशाळेतून दूध काचेच्या बाटल्यांमधून शहरात जाते . प्रतिलिटर दुधासाठी त्याला ५० रुपये मिळतात.