हॅलो कृषी ऑनलाईन : शेती व्यवसायाकडे आजही काही तरुण नाक मुरडतात तर काहीजण नोकरी सोडून शेतीकडे वाटचाल करताना दिसतात. मात्र अशातच एक तरुण ज्याला जन्मतः दोन्ही पाय नव्हते, अशा तरुणाने केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दहा एकर शेती फुलवली. त्यातून भरघोस उत्पन्न मिळवले. एवढंच नाही तर शेतीच्या जीवावर त्याने आपल्या दोन बहिणींचे लग्न देखील करून दिले आहे. गजानन नरोटे असे या मेहनती शेतकऱ्याचे नाव असून त्याची ही कहाणी नक्कीच धडधाकट माणसाच्या आयुष्याला प्रेरणा देणारी ठरेल.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चोरंबा येथील गजानन नरोटे हे जन्मतः अपंग असल्याने त्यांना दोन्ही पाय नव्हते. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा असूनही घरातील परिस्थीत नसल्याने त्यांनी आपलं शिक्षण थांबवले. त्यानंतर त्यांनी शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. शेती करताना त्यांना सुरुवातीला भयंकर त्रास झाला. मात्र हळू हळू सवयीने त्यांनी शेती व्यवसायात चांगलाच जम बसवला. आता गजानन नरोटे हे स्वतःच पिकांना पाणी देणे, नांगरटी, पेरणी, निंदनी, खुरपणी आदी कामे करतात. तसेच गजानन हे दूध देणाऱ्या दोन जनावरांचे पालनपोषण देखील करतात. या शेती व्यवसायातून त्यांनी आपल्या दोन बहिणींची लग्न देखील केले आहे.
शेती व्यवसायाच्या जोरावर दोन बहिणींचे लग्न केले; तिसऱ्या बहिणींचे ९ मे रोजी लग्न
गजाननने स्वतःच्या ३ तीन एकर क्षेत्रात शेती फुलवली. त्यानंतर दुसऱ्याची ७ एकर शेती करायला घेऊन गेल्या ११ वर्षांपासून लाखो रुपये कमावले. यातून कौटुंबाला आर्थिक स्थैर्य देऊन दोन बहिणींचं लग्न केलं. आता तिसऱ्या बहिणीचे लग्न ९ मे रोजी असून याचा खर्च तो स्वतःच उचलणार आहे. दोन्ही पायांनी जन्मतः अपंगत्व आलं असलं तरीही हार न मानता गजाननने केलेली कामगिरी ही नक्कीच प्रेरणादायी आहे.