हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये कमालीची वाढ होत होती. मात्र आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खाद्य तेलाच्या किमती कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने तेल कंपन्यांना दिले आहेत. केंद्र सरकारनं खाद्यतेल उत्पादक आणि मार्केटिंग कंपन्यांना आयात केल्या जाणाऱ्या स्वयांपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या एमआरपी म्हणजेच कमाल किरकोळ किंमत तातडीने कमी करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. याबाबतची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
विशेषतः सूर्यफूल ,पामतेल आणि सोयाबीन तेलाच्या किमती १०-१२ प्रतिकिलोने कमी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने तेल कंपन्यांना दिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाची उपलब्धता वाढली आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने तेलाचे दर आठवडाभरात कमी झाले पाहिजेत अशा सुचना तेल कंपन्यांना दिल्या आहेत.
भारत खाद्यतेलाच्या बाबतीत ६०% आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बदलांचा परिणाम चटकन भारतीय तेलाच्या किमतींवर होतो. सर्व महत्त्वाच्या तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पुढच्या एका आठवड्यात तेलांच्या किंमती कमी करण्याचे आणि केंद्राच्या सल्ल्याचे पालन करण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी याबाबत महत्त्वाची बैठक घेतली.