हॅलो कृषी ऑनलाईन : बीड जिल्ह्यातील शेतकरी नामदेव जाधव यांनी शेतातील ऊस कारखाना नेत नसल्याने ऊस शेत पेटवून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली, ही आत्महत्या नसून सरकारच्या अनावस्थेचा बळी आहे. त्यामुळे जाधव यांचा तेरावा मंत्रालयात घालणार असल्याची इशारा आज बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला.
आत्महत्याग्रस्त नामदेव जाधव यांच्या अस्थींचे आज कराड येथील कृष्णा कोयनेच्या प्रीतीसंगमात विसर्जन करण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष बी जी काका पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, विनायकराव पाटील लातूर, माणिकराव कदम परभणी, शिवाजीराव माने कोल्हापूर, धनाजी चूडमुंगे शिरोळ, स्वाभिमानीचे देवानंद पाटील, रयत क्रांतिचे सचिन नलवडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणाले , स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी या महाराष्ट्राची जडणघडण केली. राज्यात सहकाराची चळवळ उभी केली. या महाराष्ट्रात साखर कारखानदारी उभी केली. याच महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यवर अन्याय होत आहे. बीड येथील येथील जाधव या शेतकऱ्याने उसाला तोड मिळत नसल्याने उसाला आग लावून आत्महत्या केली. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गावाकडे जाऊन रक्षा आणली आहे. त्याचे आम्ही प्रीतीसंगमात विसर्जन केले आहे. या सरकाराला सद्बुद्धी मिळूदे. अशी यशवंतराव यांच्या समाधीस्थळी प्रार्थना केली आहे. येणाऱ्या काळात सर्व शेतकरी संघटना मंत्रालयामध्ये जाऊन तीव्र आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे.