हॅलो कृषी ऑनलाईन : कराड तालुक्यातील किरपे येथे पाच वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी किरपे गावाशेजारील येणके येथे बिबट्याने पाच वर्षाच्या मुलावर हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर पुन्हा ५ वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने आपली शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, किरपे येथे गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता धनंजय देवकर यांच्या शिवारात ते शेतीचे काम उरकून घरी येण्यासाठी निघाले होते. त्यांचे शेती अवजार साहित्य हे भरून पिशवीत ठेवत होते. त्यांचा लहान मुलगा राज धनंजय देवकर वय वर्ष ५ हा त्यांच्या जवळच खाली वाकून शेती अवजारे वडिलांना उचलून देण्यासाठी खाली वाकलेला असताना अचानक बिबट्याने हल्ला केला व मुलाला मानेला पकडून ओडून शेतात घेऊन जाऊ लागला.
वडिलांनी धैर्याने केला सामना , मुलाचे वाचवले प्राण …
प्रसंगवधान राखत अतिशय धैर्याने वडिलाने मुलाचे पाय पकडून त्याला बिबट्याच्या तोंडातून सोडविण्यासाठी ओढू लागले व आरडा ओरडा केले. शेतालगत असलेल्या तारेचे कुपनात बिबट्या धडकल्याने त्याला मुलाला पुढे ओढता आले नाही.आणि त्याने मुलाला सोडले. सुदैवाने मुलगा सुटला व वडिलाने त्याला उचले. सदर राज देवकर ह्यास मानेला व कानाला दात जोरात लागले आहेत, तर पाठीवर व पायावर किरकोळ जखमा झाल्या आहेत.पुढील उपचारासाठी त्याला कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सहायक वनसंरक्षक महेश झांझुरणे, वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव राक्ष्जक रोहन भाटे, वनपाल व वनरक्षक, तसेच पोलीस पाटील किरपे हे सर्व हॉस्पिटल मध्ये उपस्थित होते. बिबट्याच्या हल्ल्याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.
पिंजऱ्यातले प्राणी माणसात …
दरम्यान, कराड तालुक्यात दोन महिन्यात दुसऱ्यादा बिबट्याने लहान मुलांवर हल्ला केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गुरुवारी हल्ला झालेल्या किरपे येथील राज धनंजय देवकर याची कराडच्या कृष्णा रुग्णालयात जाऊन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट घेतली. यावेळी खोत यांनी वन खात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. वन खात्याचा कारभार सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. ते पिंजऱ्यातून बाहेर निघत नाहीत, मात्र पिंजऱ्यातले प्राणी माणसात येऊ लागले आहेत, अशी टीका खोत यांनी केली. या मुलाला योग्य मदत द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.