हॅलो कृषी ऑनलाईन । दि. 17 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशीव, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दि. 18 मार्च रोजी हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 17 व 18 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशीव, जालना, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
तसेच दि. 17 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशीव, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दि. 18 मार्च रोजी हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 ते 23 मार्च 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे तर दिनांक 24 ते 30 मार्च 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
हायटेक शेती करून असा कमवा दुप्पट नफा
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग परभणी जिल्हयात किंचित वाढलेला आहे तर इतर जिल्हयात तो कमी झालेला आहे. मराठवाडयातील सर्व जिल्हयात जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 22 ते 28 मार्च 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
- काढणी केलेल्या हरभरा, करडई, गहू व रब्बी ज्वारी पिकाची मळणी पावसाची उघाड बघून लवकरात लवकर करून घ्यावी.
- मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
- मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा.
- काढणी/मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.
- तूरळक ठिकाणी झालेल्या गारपीट व पावसामूळे काढणी केलेले पिक भिजले असल्यास वाळल्यानंतर मळणी करावी. काढणी केलेल्या करडई पिकाची मळणी पावसाची उघाड बघून लवकरात लवकर करून घ्यावी.
- काढणी न केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी पावसाची उघाड बघून करावी. काढणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची मळणी पावसाची उघाड बघून लवकरात लवकर करून घ्यावी.
- काढणी केलेल्या कणसांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेली कणसे ताडपत्रीने झाकून ठेवावा.
- काढणीस तयार असलेल्या व काढणी न केलेल्या हळद पिकाची काढणी पावसाची उघाड बघून करावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत.
- हळदीची उघडयावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी झालेल्या गारपीट व पावसामूळे काढणी केलेले पिक भिजले असल्यास वाळल्यानंतर साठवणूक करावी.
- काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पावसात भिजल्यास त्याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत. तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, गारपीट व पाऊस यामूळे भिजलेला कडबा वाळल्यानंतर साठवणूक करावी.
- काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
- तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, गारपीट व पाऊस यामूळे संत्रा/मोसंबी, द्राक्ष, आंबा बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
- संत्रा/मोसंबी बागेत मोडलेल्या फांद्यांची छाटणी करून त्यावर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी पावसाची उघाड बघून करावी.
- तूरळक ठिकाणी झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे आंबा व डाळींब बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेन्डाझीम 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
- चारा पिके
काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, गारपीट व पाऊस यामूळे नूकसान झालेल्या भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज गोळा करून नष्ट करावीत. तूरळक ठिकाणी झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला पिकात रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेन्डाझीम 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
मराठवाडा विभागात हवामान उष्ण व कोरडे (ड्रायहिट) या प्रकारचे आहे. पावसाळा या ऋतु व्यतिरीक्त हिवाळा व उन्हाळ्यात संगोपनगृहातील आर्द्रता मर्यादित ठेवणे (म्हणजे 22 ते 28 अं.से. तापमान व आर्द्रता 80 ते 85 टक्के) आवश्यक असते. हे मराठवाडा विभागातील 98 टक्के कच्च्या शेडनेटगृहात अवघड जात असून अडचणीचे ठरते, त्यामूळे शेतकऱ्यांनी हळूहळू सिमेंट काँक्रीटचे पक्के संगोपन गृह बांधकाम करावे. म्हणजे आपले कोष उत्पादनात 15 ते 20 किलो प्रति 100 डीएफएलएस वाढ तर होतेच पण तापमान व आर्द्रता मर्यादित ठेवणे सोयीचे होते. 15 ते 20 वर्ष रेशीम उद्योग करणे शक्य होते.