हॅलो कृषी ऑनलाईन : नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शेतकरी कसाबसा पिकांना जगवतो आहे. त्यात आणखी अडचणीत भर म्हणून की काय वन्य प्राण्यांनी केलेल्या नासधुसीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. भात, नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांचे गव्यांनी मोठं नुकसान केलं आहे. याचाही नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून गवे भात, नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. गव्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही शेतकन्यांनी जमीन पडीक ठेवली आहे. तर काहींनी पडीक जमिनीत काजू, आंबा कलमांची लागवड केली केली आहे. मात्र, गव्यांनी या कलमांचीही नासधूस करण्यास सुरुवात केली आहे.
काही ठिकाणी दिवसाढवळ्या लोक वस्तीतील भात शेतीतही गव्यांचे दर्शन होत आहे. गव्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सध्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वन विभागाच्या वतीनं केले जात आहेत. मात्र, नुकसान भरपाई मिळत नाही. गव्यांची संख्या खूप वाढली असून सह्याद्री पट्ट्यातील आंबोली, दोडामार्ग तालुका, माणगाव खोरे, सावंतवाडी तालुक्यातील बऱ्याच गावांत गव्यांचे वास्तव्य दिसत आहे.