हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीच्या ज्या योजनांनी त्यांना ऐतिहासिक यश मिळवून दिले त्यापैकी एक योजना म्हणजे लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) होय. महायुतीच्या प्रचारातील इतर मुद्यांपैकी लाडकी बहिण योजना ही गेमचेंजर ठरली. त्यामुळे, भाजप महायुतीने (Mahayuti) तब्बल 236 जागांसह स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. तर, काँग्रेस महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवरच समाधान मानावे लागले.
या निवडणुकीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावांना राज्याच्या सत्तेवर परत एकदा बसविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरल्याचं म्हटलं. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या, तसेच लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा देखील केली. शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील,असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
याअगोदर ही योजना मध्यप्रदेशात सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या बळावरच लोकसभा निवडणुकीत शिवराज सिंग चौहान यांना मध्यप्रदेशात संपूर्ण जागा मिळविण्यात यश मिळाले होते. महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुद्धा लाडक्या बहिण योजनेने इतिहास घडवला आहे.
माझी लाडकी बहिण योजनेमुळे, (Ladki Bahin Yojana) विरोधकांच्या मनात धडकी भरली आणि निवडणुकी अगोदर ते या योजनेविरुद्ध न्यायालयात सुद्धा गेले होते. परंतु या योजनेमुळे महायुतीला असे दैदिप्यमान यश मिळाले की विरोधी नेता बनवण्याएवढी सुद्धा संख्या एकाही विरोधी पक्षाला गाठता आली नाही.
मुख्यमंत्री शिंदेंनी लाडक्या बहिणींवर कौतुकाचा वर्षाव केला. राज्यात यंदा लाडक्या बहिणींची लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले, हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला. त्यामुळे, हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता, लवकरच तुम्हाला देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांचे 2100 करणार असून याचासुद्धा निर्णय आपण घेतल्याचे शिंदेंनी सांगितले. तुम्ही घेतलेला निर्णय यशस्वी झाला, समोरच्या लोकांना तुम्ही डम्पिंगमध्ये टाकून दिलं असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता विरोधकावर टीका केली.
दरम्यान, निवडणूक निकालानंतर सर्वच राजकीय नेत्यांनी आणि विश्लेषकांनी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) उल्लेख केला आहे. लाडकी बहीण योजनेमुळेच भाजप महायुतीला एवढा मोठा विजय झाल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाल्याचं दिसून येत असल्याचं म्हटलं. सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींना योजना बंद होण्याची भिती दाखवून मतदानासाठीचं आवाहन केलं होतं, असेही पवार यांनी म्हटलं. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही लाडकी बहीण योजनेमुळे मतदानाचा टक्का वाढला असून आम्हाला त्याचा फायदा झाल्याचं म्हटलं आहे.