Onion Export : ‘महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एवढा आकस का?’; कांदा प्रश्नावर रोहित पवार आक्रमक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील बेंगलोर रोझ कांद्याबाबत (Onion Export) नुकताच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून बेंगलोर रोझ कांद्यावरील 40 टक्के शुल्क हटवल्यात आले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. राज्यातील कांद्याचे निर्यात शुल्क मात्र ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.1) लासलगाव बाजार समितीतील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला, तसेच लिलाव देखील बंद पाडले. अशातच आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) रोहित पवार आक्रमक झाले आहे. रोहित पवार यांनी कांदा निर्यात (Onion Export) प्रश्नावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्राला वेगळा न्याय का? (Rohit Pawar On Rose Onion Export)

केंद्र सरकारने कर्नाटकात पिकवल्या जाणाऱ्या बंगळुरू रोझ व्हारायटीच्या कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क हटवले आहे. याआधी गुजरातमध्ये पिकवल्या जाणाऱ्या कांद्यासाठी निर्यातबंदी पूर्णतः उठवली होती. परंतु महाराष्ट्राचा कांद्यावरील निर्यातबंदी अद्यापही उठवलेली नाही. इतर राज्यात पिकवल्या जाणाऱ्या कांद्याच्या व्हरायटी निर्यातीसाठी मुक्त करायच्या आणि महाराष्ट्रात पिकणाऱ्या कांद्याच्या व्हरायटीवर निर्यातबंदी लावायची असे का? केंद्र सरकारचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एवढा आकस का? असा सवाल रोहित पवारांनी सरकारला विचारला आहे.

राज्यातील सरकार सुस्त

कर्नाटक सरकारने पाठपुरावा करून तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. पण आपल्या राज्य सरकारला मात्र काहीही घेणेदेणे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आपण सर्वांनी पाठपुरावा करून या केंद्र सरकारला जाता जाता तरी एखादा चांगला निर्णय घेण्याची विनंती करावी, अशी मागणी करत रोहित पवारांनी खोचक टोला लगावला आहे. रोहित पवार यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना नरेंद्र मोदींच्या सभेत शेतकऱ्यांनी कांद्याच्या मुद्दयावरून जोरदार घोषणाबाजी केली होती. बंगळुरू येथील ‘बेंगलोर रोज’ हा कांद्याला शून्य टक्के निर्यातमूल्य आकारून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे का? असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे.

error: Content is protected !!