हॅलो कृषी ऑनलाईन : सकेलेन मुलाणी, कराड
केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे हे आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असे देखील आवाहन केले आहे. मोदींच्या या घोषणेनंतर देशातल्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयावरून राजकीय क्षेत्रातून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया कराड येथे बोलताना व्यक्त केली आहे. केंद्राने हे कृषी कायदे रद्द केले आहेत त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारने मागच्या वर्षी तीन कृषी कायदे हे लागू केले होते आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत होता आणि या देशांमध्ये भांडवलशाही वाढते की काय अशी परिस्थिती होती. मी या विभागाचा मंत्री आहेत सहकार व पणन मंत्री… त्याअंतर्गत मार्केट कमिटीचा जो कायदा आहे त्यामध्ये त्यांनी काही निर्बंध लावले होते. किंवा काही त्यामध्ये सुधारणा केली होती. सध्याच्या प्रचलित परिस्थितीमध्ये शेतकरी मार्केटमध्ये माल घेऊन येतो कारण त्याला विश्वास असतो इथला व्यापारी इथला अडत्या मला त्याच्या मालासाठी योग्य रक्कम देईल असा विश्वास त्याला असतो. या नवीन कायद्यामध्ये एपीएमसीच्या बाहेरच्या आवारात सुद्धा व्यवसाय करायची परवानगी होती. एवढेच नव्हे तर त्याच्या लायसन्स बाबतीत सुद्धा कोणतेही निर्बंध नव्हते. आणि म्हणून राज्य सरकारने या कायद्याला विरोध केला. नवीन कायदा करण्यासाठी मंत्रीगण स्थापन केला. दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने हे तीन कृषी कायदे रद्द केले आणि त्यामुळे देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला ” अशी प्रतिक्रिया सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.