हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा (Organic Farming) मार्ग स्वीकारावा जेणेकरून देशातील रासायनिक खतांची मागणी कमी होऊन अन्नद्यान्याच्या उत्पादनात वाढ होईल. असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केले आहे. बुधवारी (ता.८) ते नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी सेंद्रिय सोसायटीद्वारे (NCOL) आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित करताना बोलत होते. सहकाराच्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादनांना (Organic Farming) प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री बीएल वर्मा, सहकार मंत्रालयाचे सचिव आणि एनसीओएलचे अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 11 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय सहकारी सेंद्रिय सोसायटीची (NCOL) स्थापना करण्यास मान्यता दिली होती. या सोसायटीच्या कार्याचा आज शाह यांच्या हस्ते अधिकृतरित्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी देशातील सहा सेंद्रिय कृषी मालांना बाजारात दाखल करण्यास परवानगी दिली आहे. राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या (NDBB) वतीने वाराणसी येथे स्थापन करण्यात आलेल्या सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पातून खतांची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता ही खते वापरून शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होईल. आणि त्याद्वारे येत्या काळात भारत सेंद्रिय उत्पादनांसाठी एक महत्वपूर्ण बाजारपेठ बनेल, असा विश्वासही शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
२० शेतमालांना लवकरच परवानगी (Organic Farming)
शेतीतील उत्पादन वाढीसाठी खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराचे वाईट परिणाम आज आपल्याला दिसून येत आहेत. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. तसेच जमीन आणि पाणी प्रदूषित होऊन अनेक आजारही बळावत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गेल्या ५-६ वर्षांत देशातील लाखो शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला असून, हळूहळू सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. असेही शहा यावेळी म्हणाले. त्यामुळे आता यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत देशातील आणखी २० सेंद्रिय शेतमालांना बाजारात विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे. असेही शाह म्हणाले. चर्चासत्रादरम्यान दाखल झालेल्या ६ शेतमालांना मदर डेअरीमार्फत विक्री करण्यास आजपासून मुभा देण्यात आली असून, ऑनलाईन स्वरूपातही ही उत्पादने ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.