हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या तरुणाईचा कल हा काहीतरी हटके करून दाखवण्याकडे असतो. त्यातही कोरोना आणि लॉकडाऊन काळात अनेक उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वाळल्याची अनेक उदाहरणे आहेत. गोंदिया इथल्या एका तरुणीने देखील सेंद्रिय शेतीची पद्धत अवलंबत चक्क परदेशी भाजीचे उत्पादन घेतले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या नीता ओंकार लांजेवार या उच्चशिक्षित तरुणीने पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ब्राह्मणटोला शिवारात एक एकर शेती विकत घेतली. खरेतर या भागात धानशेती प्रामुख्याने केली जाते. मात्र शेती करताना मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशके आणि खतांचा वापर होतो. त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची अनेक उदाहराने समोर येत आहेत. म्हणूनच लांजेवार यांनी जैविक शेतीचा मार्ग अवलंबला. नीता यांनी पद्धतशीर नियोजन केले आणि त्यांनी शेतात ठिबक सिंचनाची सुविधा केली. शेतात सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग केला.
झुकिनीची यशस्वी लागवड
त्यांनी झुकिनी आणि इतर विदेशी पिकांची लागवड केली. झुकिनी ही विदेशी भाजी असल्याने स्थानिकांमध्ये तिचा स्वाद नव्हता. पण हळूहळू प्रचंड मागणी वाढली. त्यांनी एक एकर क्षेत्रात मिश्र भाजीपाला, फळबाग आणि फुलशेतीचा अत्यंत सुंदर संयोग साधला. सेंद्रिय शेतीतून उत्पादित झालेला भाजीपाला पसंत करणारी अनेक लोक आहेत. अशा लोकांचे मोबाईल क्रमांक घेऊन एक व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपवर आज उपलब्ध असलेल्या भाजीपाल्याची नोंद केली जाते.
व्हाॅट्सॲप ग्रुप बनले मार्केटिंगचे साधन
इच्छुक व्हाॅट्सॲप धारक मोबाईलवर हव्या असलेल्या भाजीची नोंदणी करतात. जितकी नोंदणी झाली तेवढ्याच भाजीची तोडणी केली जाते. तेवढी भाजी पॅकिंग करून दिली जाते. शेतमाल शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो. तर लोकांना विषमुक्त भाजी उपलब्ध करून देण्याचा मनोमन समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो आहे. नीताताईंसारख्या इतरही महीलांही शेतीकडे वळल्या तर शेतीमध्येसुद्धा महिलासुद्धा क्रांती केल्याशिवाय राहणार नाही.