हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी मित्रांनो सध्या द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे काढणी आणि बेदाण्यासाठी द्राक्ष वाळवण्याची कामं सुरु असताना अचानक आलेल्या वादळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तासगाव शहरासह तालुक्याला गुरुवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. हा पाऊस तासभर सुरू होता. पावसामुळे द्राक्ष ,बेदाणा उत्पादक,व काढणीला आलेल्या गहू व शाळू उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसाने काढणीच्या द्राक्षाचे नुकसान होणार असून बेदाणा काळा पडणार आहे.
वादळी वाऱ्याने तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठंमोठी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद होत वाहतूक रात्री उशिरापर्यंत खोळंबली होती. तासगाव तालुक्यात सध्या द्राक्षहंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र अवकाळीच्या झालेल्या पावसाने द्राक्षबागायतदार हबकला आहे. तर पाऊस सततच्या ढगाळ हवामानामुळे बेदाणा शेडवर टाकण्यात आलेली द्राक्षे व बेदानाही काळा पडण्याची भिती आहे. त्यातच सध्याच्या चालू हंगामात व्यापाऱयांनी द्राक्षाचे दर पाडून चांगलीच लूट केली आहे.
मागील वर्षी कोरोना ,आता पाऊस यामुळे शेतकरी हबकला आहे. वादळी वाऱ्याने चिंचणी, लोढे, कौलगे,सावर्डे,आरवडे, खूजगाव,वाघापूर, बस्तवडेसह अनेक गावांत रस्त्यावर मोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहूतुक ठप्प होती. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते. वाऱ्याने काही ठिकाणी विद्युत पोल पडत तारा तुटल्याने वीज गायब होती.