हॅलो कृषी ऑनलाईन : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तींनी उच्छाद मांडला आहे. अन्न व पाणीसाठा यामुळे तिलारीत विसावलेल्या रानटी हत्तींनी शेतकऱ्यांच्या बागायती शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. तिलारी खोऱ्यातील केर, मोर्ले, बाबरवाडी या भागात पाच हत्तीचा कळप फिरत असून केळी, माड, सुपारी, काजू या बागायतीचे मोठं नुकसान करत आहेत. मे महिन्याच्या हंगामात फणस खाण्यासाठी कधी कधी रात्रीच्या वेळेस हे हत्ती अगदी घरालगत येत आहेत. यावर आता शेतकऱ्यांनी नवा पर्याय शोधून काढला आहे.
गावकऱ्यांना मिळणार अलर्ट
तिलारीतील मोर्ले गावात ‘कोरबेटी फांऊडेशन बांदा’ यांनी सेन्सर सायरन बसवले आहेत. हत्ती त्या मार्गावरुन जर जात असतील तर हा सायरन आपोआप वाजणार आहे. हत्तीच्या ये जा करण्याच्या मार्गावर 100 मिटरच्या अंतरावर हे सायरन बसवले आहेत.सायरनचा आवाज येताच त्या मशीनला बसवलेल्या लाईट चालू होतील. हे मशीन प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आल्या आहेत. वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने हे मशीन मोर्ले गावात बसवण्यात आले आहेत. त्यामुळे हत्ती गावच्या वेशीवर येताच गावकऱ्यांना अलर्ट मिळणार आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
तिलारी खोऱ्यातील केर, मोर्ले, बाबरवाडी या भागात पाच हत्तीचा कळप फिरत असून केळी, माड, सुपारी, काजू बागायतीचे मोठं नुकसान करत आहेत. त्यामुळे लवकर याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसात हत्तींना मोठ्या प्रमाणात फणसाच नुकसान केले आहे, त्यामुळे फणसाचे उत्पादन कमी झाले आहे. तसेच नारळाची, केळीची बाग, बांबू याचेदेखील हत्तींनी मोठं नुकसान केलं आहे. शासन याठिकाणी कोणतेही लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगतिले. नुकसानग्रस्तांना तुटपुंजी मदत शासन करते. त्यांनी भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.