तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करु नका, मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना भावनिक साद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिंदे- फडणवीस सरकार वर विरोधक सातत्याने टिका करीत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना अतिशय भावनिक आवाहन केले आहे. पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे. ‘तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आत्महत्या करु नका’ असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलंय तसंच सरकार कायम बळीराजासोबत असल्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी या पत्रातून दिली आहे.

काल एका शेतकऱ्याने विधानभवनाबाहेर थेट स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. दरम्यान यासंदर्भात शेतकऱ्यांनो तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करु नका अशी भावनिक साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेतकरी बांधवांना पत्राद्वारे घातली आहे.

के आहे पत्रात ?

महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचंही काम करताहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतू, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं, तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात. हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं. वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.

रडायचं नाही, लढायचं…

लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं….
‘शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका..आत्महत्या करू नका… मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं.

मी आणि माझं सरकार सतत 24 तास तुमच्यासाठी तुमच्यासोबत आहे, याची खात्री बाळगा. जीव देणं बंद करुयात. जीव लावूयात एकमेकांना. चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया! असे भावनिक साद घालणारे पत्र एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना लिहलं आहे. या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच सरकार तुमच्या पाठिशी उभं असल्याचा विश्वास दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!