हॅलो कृषी ऑनलाईन : कर्जमाफीची घोषणा होऊनही पात्र असताना कर्जमाफी अद्याप मिळाली नसल्याच्या कारणामुळे औरंगाबाद येथे शेतकऱ्याने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. हा प्रकार औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या आवारात घडला. अनेकदा अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकरी थेट पाण्याच्या टाकीवर चढला. यामुळे मात्र प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार या शेतकऱ्याचे नाव तीर्थराज दत्तात्रय गिरगे रा. नायगाव ता.पैठण, जी.औरंगाबाद असे आहे. गिरगे यांनी 2016 मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पैठण शाखेतून 97 हजार शेतीसाठी कर्ज घेतले होते.सरकराने छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना अशा दोन कर्जमाफी योजना जाहीर केल्या. तर या दोन्ही कर्जमाफी योजनेस पात्र असतांना संबधित बँकेकडून कर्ज माफीच्या यादीमध्ये आपले नाव समाविष्ठ केले नसल्याचा आरोप गिरगे यांनी केला आहे.
तर बँकेने सदरील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी गिरगे यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली असून, थकीत रक्कम न भरल्यास न्यायालयात केस दाखल करण्याची धमकी दिली आहे. तर दोन्ही योजनेचा कर्ज माफीचा लाभ मिळावा म्हणून, विहित अर्ज देऊन देखील याचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच बँकेकडे वारंवार याबाबत चकरा देखील मारल्या होत्या, परंतु बँकेने उडवा उडवीचे उत्तरे देवून मला कर्ज माफी पासून वंचित ठेवले असल्याचा आरोप तीर्थराज गिरगे यांनी केला आहे.