Success Story : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी कधी पाऊस जास्त होऊन पिकांचे नुकसान होते. तर कधी दुष्काळ पडल्याने या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. त्यामुळे बऱ्याचदा हातात तोंडाशी आलेले पीक डोळ्यासमोर नष्ट होते. मात्र असं असलं तरी येथील शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करत नवीन काहीतरी करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, असंच काहीसं औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील एका शेतकऱ्याने करत लाखोंची कमाई सुरू केली आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
औरंगाबाद येथील शेतकऱ्यांने गुलाब फुलाची शेती पिकवून त्यातून लाखो रुपयांची कमाई सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्याला यश आलं असून आजच्या घडीला तो शेतकरी महिन्याकाठी गुलाबाच्या फुलातून सव्वा लाखांची कमाई करत असल्याची माहिती स्वतः शेतकऱ्याने दिली आहे. बाबासाहेब गोदरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. (Success Story )
पैठण तालुक्यातील वडजी शिवारामध्ये बाबासाहेब गोदरे यांना जवळपास 12 एकर शेती आहे. त्यामध्ये त्यांनी सहा एकरामध्ये डाळिंबाची लागवड केली असून दोन एकर मध्ये मोसंबी लावले आहे तर उर्वरित क्षेत्रामध्ये त्यांनी गुलाब आणि निशिगंधा फुलाची लागवड केली आहे. मागच्या दोन वर्षापासून ते हे गुलाब शेती करत असून त्यांना दर महिन्याला जवळपास एक लाख ते सव्वा लाख रुपयांचा नफा या गुलाब विक्रीतून मिळत आहे.
गुलाबाच्या झाडाला नऊ महिने फुल येतात मात्र या झाडांपासून ऑगस्ट ते मार्चच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत सातत्याने फुले येतात. मार्चमध्ये जास्त ऊन जाणवत असल्यामुळे या फुलांवर उन्हाचा देखील वाईट परिणाम होतो. मात्र सप्टेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये सतत फुल तोडणी करावी लागत असल्याची माहिती स्वतः शेतकऱ्यांने दिली आहे.
महिन्याला लाखोंची कमाई
गोदरे हे गुलाब शेतीची लागवड करण्याआधी ज्वारी, सोयाबीन अशा पिकांची लागवड करत होते. मात्र दरवर्षी संकट हे यायचेच. त्यामुळे यामधून त्यांना मशागतीसाठी झालेला खर्च देखील मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी कंटाळून गुलाब शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांना गुलाब शेतीतून चांगला फायदा होत आहे. ते जवळपास महिन्याकाठी एक लाख ते सव्वा लाख रुपये निव्वळ नफा कमवत आहेत.