हॅलो कृषी ऑनलाईन : देशात अनेक वर्षांपासून तरुणांना रोजगारासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तसेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करावं लागत आहे. काही वेळा रोजगार मिळतो तर कधी रोजगार मिळत देखील नाही. यासाठी काही तरुण जे मिळेल ते काम करत असतात. उच्चशिक्षित तरूणांनी आतापर्यंत अनेक नोकऱ्या पहिल्या परंतु यश न मिळाल्याने दुसऱ्या क्षेत्रात जम बसवून आपले काम सक्रिय ठेवले. नाशिकमध्ये एका तरुण शेतकऱ्याने ‘डी.एड’चे शिक्षण घेतलं. दहा वर्षे शिक्षकभरती न निघाल्याने कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून यश मिळवले.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंकेश्वर तालुक्यातील सापगाव येथील संदीप कचरे यांचे २०१२ या सालात डी. एडचे शिक्षण घेतलं होतं. दोन वर्षांचं शिक्षण झालं. शिक्षणानंतर एक, दोन नाही तर तब्बल दहा वर्षे उलटून गेली. आता काही तरी करावं या जिद्दीने त्याने सुरुवातीला कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. कोणाचंही मार्गदर्शन नाही अशा स्थितीत त्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. आपल्या मदतीला कुणी येणार नाही. हे आपल्याला करायचं असून निश्चय मनाशी धरा हे त्यांचे सांगणे आहे. त्यानंतर त्याने या व्यवसायात जम बसवला.
सक्सेस स्टोरी संदीप कचरे
सुरुवातीला संदीप यांनी शंभर कोंबड्यांपासून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. आज जवळ जवळ अडीच ते तीन हजार पक्षांचा व्यवसाय झाला. त्यातून महिन्याला घरखर्च वाचेल इतकी चांगली कमाई केली जाते. कचरे म्हणाले की, १०० कोंबड्यांसाठी दहा हजार रुपये खर्च येतो. १०० पक्षांच्या शेडसाठी १० हजार रुपये खर्च येतो. तसेच २५०० ते ३००० खर्च हा पक्षांसाठी तसेच ५ हजार खर्च पक्षांच्या खाद्यासाठी होतो.
१०० कोंबड्या मागे ४०-५० रोजची अंडी मिळतात. त्यानुसार आपला रोज चालू होतो. साधारण दिड ते २ वर्षापर्यंत कोंबडी अंडे देते. असं सर्वसाधारण या व्यवसायाचे स्वरूप असतं. यातून मिळणाऱ्या आर्थिक वाटा या दोन ते तीन बाजूंनी येत आहेत. नोकरीच्या मागे न लागत व्यवसाय करा. मेहनत केल्यानंतर यश नक्की मिळेल. असे संदीप कचरे म्हणाले.