हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम (Sugarcane FRP) अदा करुन पैसे शिल्लक राहिले आहेत. या पैशावरती शेतकऱ्यांचा अधिकार आहे. पण राज्यातील सर्व पक्षाचे साखर कारखानदार एक होऊन, या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. याबाबत (Sugarcane FRP) राजू शेट्टींनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांनी पत्र लिहले आहे.
कारखान्यांना लेखी आदेश देण्याची मागणी (Sugarcane FRP Issue In Maharashtra)
राज्यात सध्या ऊस गाळप हंगाम संपला असून, अनेक कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीचे (Sugarcane FRP) पैसे शिल्लक आहेत. या पैशांवर शेतकऱ्यांचा अधिकार आहे. मात्र, राज्यातील सर्व पक्षाचे साखर कारखानदार एकत्र येऊन, या पैशावरती डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहे. परिणामी, गतवर्षी हंगामात झालेली चूक कारखानदारांनी न करता यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन एफआरपी पेक्षा जादा रक्कमेला मंजूरी देण्याबाबत कारखान्यांना लेखी आदेश निर्गमित करावा. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
काही कारखान्यांकडून थकबाकी शिल्लक
मागील दोन वर्षापासून केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील साखर कारखान्यांनी ऊसापासून इथेनॅाल निर्मीती करण्यास प्राधान्य दिले आहे. ज्यामुळे साखर, इथेनॅाल, बगॅस, को -जन, स्पिरीट, अल्कोहोल, मळी यासह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे. यामुळे साखर कारखान्यांकडे उत्पादन खर्च वजा जाता पैसे शिल्लक राहू लागले आहेत. राज्यातील काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना सर्व थकबाकी चुकती केली आहे. मात्र, काही कारखान्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव पारित झाला नसल्याचे कारण दिले आहे. ज्यामुळे संबंधित कारखान्यांच्या शेतकऱ्यांना संपूर्णतः उसाची थकबाकी मिळू शकलेली नाही, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
…तर शेतकऱ्यांना फायदा होणार
परिणामी, राज्याच्या साखर आयुक्तांनी थकबाकी शिल्लक असलेल्या सर्व कारखान्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर घेऊन, या विषयास मंजूरी घेण्याबाबत लेखी आदेश काढावेत, अशी मागणी केली आहे. ज्यामुळे राज्यातील सर्व कारखान्यांना लेखी आदेश काढत, या विषयास साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये हा शेतकरी हिताचा निर्णय झाल्यास, याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. असेही शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.