हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो पावसाळा सुरु झाला कि जनावरांच्या इतर आजाराबरोबर खुरांचे आजारही दिसू लागतात. वातावरणातील वाढलेली आर्द्रता पावसामुळे सततचा होणारा चिखल खुरांच्या आजारास कारणीभूत ठरतो. सोबतच जनावरांची कमी झालेली रोगप्रतिकारशक्तीही काही अंशी कारणीभूत असते. यामुळे जनावरांची प्रकृती खालावते.अचानक आलेल्या लंगडेपणामुळे बैल शेतीकामात निरुपयोगी ठरतो.
लक्षणे
–जनावरांची खुरे जास्त वेळ ओली राहिल्याने नरम पडतात. खूर नरम पडल्याने खुरांमध्ये अल्सर तयार होतात.
–खुरांमध्ये गळू तयार होण्याची शक्यता वाढते.
–खुरांच्या आतील भागात असलेल्या लॅमिना या नाजूक भागाचा दाह होतो.
–जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशींमध्ये हा प्रकार दिसून येतो.
–खुरांचा दाह झाल्याने, जनावराला बसायला उठायला त्रास होतो. जमिनीवर पाय टेकवत नाहीत.
–खुरांना भेगा पडल्याने जीवाणू संसर्ग होतो.
–खुरांमधून सडल्यासारखा वास यायला सुरुवात होते. जनावरं लंगडायला सुरुवात करते.
— खुरांना तडा जाऊन त्यातून पु बाहेर यायला लागतो.
–वेळेत उपचार न केल्यास खुरांचा संसर्ग सांध्यापर्यंत वाढत जातो.
उपाय
–सध्या आपल्याकडे मुक्त संचार पद्धत जास्त प्रचलित आहे. या पद्धतीमध्ये पावसाळ्यात जनावरांची खुरे नरम पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पावसाळ्याआधी मुक्त गोठ्यातील शेणखत आणि खुरीखात काढून त्यावर नवीन मुरूम टाकावे.
— प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरे उभी राहण्याची जागा कोरडी, चिखलविरहीत राहील याची काळजी घ्यावी.
–खुराचा संसर्ग झालेला भाग स्वच्छ धुऊन त्यावर प्रतिजैवकयुक्त मलम लावावे.
–कॉपर सल्फेटचे द्रावण तयार करून त्यात जनावराचे पाय बुडवल्यास प्रतिबंध करण्यास मदत होते.
–जनावरे लंगडताना किंवा खुरांना जखम दिसल्यास त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.