हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी
श्री रेणुका शुगर साखर कारखान्याच्या गाळप क्षमता वाढीसाठी मी सकारात्मक प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणुन अवसायक मंडळातील ५ पैकी ४ सदस्यांनी कारखान्याची गाळप क्षमता वाढावी यासाठी कारखाना प्रशासनाकडे सहमतीपत्र दिले आहे. तालूक्यातील व कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भविष्यातील फायद्यासाठी मी प्रयत्न करत असताना कारखाना बुडविणारे मात्र पत्रकार परिषद घेत चुकीची भुमिका मांडत असुन त्यांच्या पोटात का दुखत आहे ? असा प्रश्न आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी माजी आमदार माणिकराव आंबेगावकर यांचे नाव न घेता उपस्थित केला आहे .
पाथरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवार ६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आ . बाबाजानी दुर्राणी बोलत होते. यावेळी मा .कृउबास सभापती अनिलराव नखाते, मुंजाजीराव भाले पाटील, मा . जि.प सदस्य सुभाषआबा कोल्हे, पी.आर. शिंदे, मा . जि.प सदस्य दादासाहेब टेंगसे, चक्रधर उगले, माधवराव जोगदंड, राकाँ तालुकाध्यक्ष एकनाथराव शिंदे, राकाँ ता .उपाध्यक्ष बंटी घुंबरे ,सैफोद्दीन फारोखी, प्रल्हाद चिंचाणे व स्थानिक नेते, कार्यकर्ते, मतदारांची यांची उपस्थिती होती.
मा .आ .माणिकराव आंबेगावकर यांनी पाथरीत काही महिण्याच्या अंतराने दोन पत्रकार परिषद घेत रेणुका साखर कारखान्याच्या गाळप क्षमता ८ ते १० हजार टन क्षमतेने वाढी संदर्भात आ. दुर्राणी हे सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करून कारखान्याचे राजकीय भांडवल करत असल्याचे म्हणाले होते .
घेतलेल्या या पत्रकार परिषदे संदर्भात आ. दुर्राणी यांनी बैठकीमध्ये बोलत असताना पहिल्यांदा जाहीररीत्या प्रतिक्रिया दिली .
ते पुढे बोलताना म्हणाले की, मी स्वतः सकारात्मक दृष्ट्या या वर्षी अतिरिक्त झालेला ऊस घालण्यासाठी सहकार मंत्री साखर आयुक्त यांच्याशी बैठका घेत शासन दरबारी प्रश्न मांडला .त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये तालुक्यातील व कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप होणार आहे .राहिला प्रश्न गाळप क्षमता वाढवण्यास संदर्भात तर कारखाना चालवणारी कंपनी सक्षम असून मनात आणले तर सहा महिन्यांमध्ये गाळप क्षमता वाढवण्याचे काम पूर्ण होईल .गाळप क्षमता वाढीचे काम तात्काळ मार्गी लागावे म्हणून अवसायक मंडळातील मी स्वतः , भावनाताई नखाते , पी .आर .शिंदे व खासदार फौजिया खान या पाच पैकी चार सदस्यांचे सहमति पत्र कारखाना प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे .त्यामुळे पुढील हंगामात उसाचे क्षेत्र वाढले तरी संपूर्ण ऊस गाळप होणार असून क्षमता वाढल्याने पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे व मानवत तालुक्यातील कार्यक्षेत्रात येणाऱ्या ९ गावांचे अर्थकारण बदलणार असून तालुक्यामध्ये समृद्धी येणार आहे. कोणतीही दूरदृष्टी नसणारे व कार्य काळामध्ये साखर कारखाना मोडकळीस आणणारे कारखान्याचे माजी चेअरमनम मनामध्ये आकस ठेवत विनाकारण नकारात्मक वक्तव्य करत आहेत अशी टिका यावेळी बोलताना आ . दुर्राणी यांनी केली .