हॅलो कृषी ऑनलाईन । मध्यप्रदेश मधील रमेश बरिया नामक एका शेतकऱ्यांनी ग्लुकोजच्या टाकाऊ बाटल्यांपासून ठिबक सिंचनाचा प्रकल्प राबविला ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत झाली आहे. त्यांच्या या युक्तीचे कौतुक करत मध्यप्रदेशचे कृषी मंत्री आणि जिल्हा प्रशासन यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. रमेश बरिया जिथे राहतात त्या झाबुआ या आदिवासी जिल्ह्यात पाण्याच्या अनेक समस्या आहेत. त्यावर मात करत त्यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.
झाबुआ जिल्ह्यात कमी पाऊस, उष्ण भूभाग आणि भेगाळलेली जमीन अशा अनेक कारणांनी शेतकऱ्यांना शेतीत पीक घेणे कठीण होते. वर्षानुवर्षे पारंपरिक शेती आणि त्यात पावसाची कमतरता त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशाच येते आहे. मात्र रमेश यांनी यावर शाश्वत पर्याय शोधून काढत मात केली आहे. ते २००९-१० मध्ये राष्ट्रीय कृषी नूतनीकरण उप प्रकल्प एनएआयपी (National Agricultural Innovation Sub Project) – केव्हीके येथील संशोधकांच्या सतत संपर्कात राहिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाऊस आणि थंडीच्या ऋतूत भाजीपाला लागवडीस सुरुवात केली. जी त्यांच्या जमिनीला लागू झाली.
हळूहळू इतर काही भाज्या वाढवून त्यांनी नफा मिळविण्याच्या दृष्टीने स्वतःची छोटी रोपवाटिकाही सुरु केली. मात्र पाऊस लांबणीवर गेल्यामुळे त्यांना चिंता जाणवू लागली आणि त्यांनी पुन्हा एनएआयपी ला संपर्क साधला जिथे त्यांना ग्लुकोजच्या बाटल्यांपासून ठिबक सिंचनाची माहिती मिळाली या टाकाऊ बाटल्या त्यांनी २०रु प्रति किलो प्रमाणे विकत घेतल्या आणि पाण्यासाठी इनलेट तयार करण्यासाठी अर्धा भाग कापून उलटा जोडला आणि हळूहळू सिंचन प्रकल्प उभा केला. त्या काठीच्या साहाय्याने टांगून रोज शाळेत जाताना मुलांना त्यात पाणी भरण्यास सांगितले. या सिंचन पद्धतीच्या साहाय्याने त्यांनी ०.१ हेक्टर जागेत १५,२००रु नफा कमविला असल्याचे एका वृत्तपत्राने सांगितले आहे. या मुळे त्यांना दुष्काळापासून रोपे वाचविण्यास देखील मदत झाली आहे.