हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहेच पावसाळ्यात चिलटांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. घर आणि शेतातल्या इतर ओलसर आणि दमट ठिकाणांसोबतच जनावराच्या गोठ्यात देखील ही चिलटं त्रासदायक ठरतात. पण तुम्हाला माहिती आहे का ? चिलटांद्वारे तिवा नामक विषाणूजन्य आजार पसरतो. आजच्या लेखात याबाबत जाणून घेऊया…
तिवा आजार होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक दूध देणाऱ्या गायी आणि नर जनावरांत अधिक असते. या आजारास डेंगी किंवा तिव असेही म्हणतात. या आजारामुळे बहुतांश जनावरे तीन दिवस बाधित होतात आणि त्यानंतर निसर्गतः बरी होतात. बाधित जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण नगण्य असले, तरी दुग्धोत्पादन आणि वळूच्या कार्यक्षमतेत प्रचंड घट होते. मराठवाडा कृषी विद्यापीठाने या आजाराची कारणे आणि उपचारा विषय़ी पुढील पाहिती दिली आहे.
आजार होण्यामागची कारणे ?
आजार होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक दूध देणाऱ्या गायी आणि नर जनावरांत अधिक असते. सहा ते बारा महिन्यांच्या वासरांना प्रादुर्भाव झाल्यास लक्षणे अतिशय सौम्य असतात. दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जनावरांत आजाराची तीव्रता जास्त असते.लक्षणे न दाखविणारी बाधित जनावरे आणि क्युलिकोइड चिलटे या आजाराचा प्रसार करतात. वातावरण आणि चिलटांचा प्रादुर्भाव यावर रोगप्रसार अवलंबून असतो.पावसाळा आणि हिवाळ्यातील वातावरणात अचानक होणाऱ्या बदलांमुळे जनावरांवर येणारा ताण या आजाराच्या प्रादुर्भावाची पूर्वनिश्चिती करतो. चिलटे वाऱ्याच्या प्रवाहासोबत इतरत्र वाहून जात असल्याने हा आजार आजूबाजूच्या गावांत सुद्धा पसरतो. आजाराचा प्रादुर्भाव आणि तीव्रता दरवर्षी बदलत जाते. एकदा आजार येऊन गेल्यानंतर ठरावीक काळानंतर या आजाराचा प्रादुर्भाव पुनःपुन्हा जाणवू शकतो. मात्र बाधा होऊन बऱ्या झालेल्या जनावरांत जीवनभरासाठी रोगप्रतिकारशक्ती तयार होते.
उपचार
आजारावर कोणताही विशिष्ठ उपचार नाही. परंतु आजार जडल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके, सलाइन, कॅल्शिअम, ब जीवनसत्त्वे, ताप निवारक आणि वेदनाशामक औषधे द्यावीत.