सातारा जिल्ह्यात 500 एकरावर कृषी उद्योग उभारणी करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. एनडीआरएफच्या निकषात बदल करुन राज्यातील शेतकऱ्यांना 4 हजार 750 कोटीच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. तसेच नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजाराची मदतही देण्यात आली. जिल्ह्यात विविध पिकांचे संशोधन होण्यासाठी बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणीसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे ज्या पशुपालकांची जनावरे दगावले आहेत त्यांनाही शासनामार्फत मदत करण्यात येत आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त भरविण्यात आलेले कृषी प्रदर्शनाचे अत्यंत चांगल्या पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्याचे प्रशिक्षण तसेच प्रगतशील शेतकऱ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण होणार आहे. शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवून आर्थिक उन्नती साधावी. हीच खरी स्व. यशवंतराव चव्हाण यांना श्रध्दांजली ठरेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणार : शंभूराज देसाई

पालकमंत्री देसाई म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्याचे मार्गदर्शन केले जाते. हे प्रदर्शन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी पर्वणी आहे. कृष्णा कोयना या नद्या शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम करित आहे. कराड पाटण सातारा येथील शेतकऱ्यांसाठी बहुउद्देशीय कृषी संकुल उभारण्याचा मानस आहे. या संकुलाच्या माध्यमातून विविध पिकांचे संशोधन करण्यात येईल. जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांमध्ये मान्सुन कालावधीत मोठा पाऊस पडतो. पण जानेवारीनंतर येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यांना बारमाही पाणी मिळावे म्हणून जलयुक्त शिवारासारखी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे, असे देसाई यांनी म्हंटले.

कराड विमानतळाचे एमआयडीसी कडे हस्तांतरण करावे : उदय सामंत

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्वाची मागणी केली. ते म्हणाले कि, कराडचे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरण केल्यास या विमानतळाचा चांगला विकास केला जाईल. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालासाठी पाचशे एकरवर ॲग्रो इंडस्ट्रीज् विकसित करता येईल यासाठी मान्यता मिळावी.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी कृषी प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रगतशील शेतकरी साहेबराव मन्याबा चिकणे, सौरभ विनयकुमार कोकिळ, रुपाली सत्यवान जाधव, विजयसिंह पोपटराव भोसले, श्रीकांत महादेव घोरपडेयांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!