हॅलो कृषी ऑनलाईन । पावसाळा सुरू झाला की, सर्वत्र निसर्गाने हिरवागार गालिचा पांघरल्या सारखे दृश्य बघायला मिळते. पावसाळ्यातील सगळ्यात मोठे आणि आरोग्यपूर्ण निसर्ग दान म्हणजे रानावनातच मिळणाऱ्या रानभाज्या. ऋतुमानातील बदलामुळे रोगराई पसरते. मात्र निसर्ग यावरील औषध देखील आपल्याला देत असतो. या पावसाळ्यात निरनिरळ्या पालेभाज्या तसेच रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने पावसाळ्यात या रानभाज्यांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
बऱ्याचदा असे म्हटले जाते की, पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नये, मात्र या रानभाज्या या दोन तीन महिन्यात मिळत असल्याने पालेभाज्या खाणारे औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्य़ा खाण्याकडे वळतात. कित्येकदा या रानभाज्यांची नावे देखील माहित नसतात तसेच त्यांचे आरोग्याकरिता असणारे फायदे माहित नसल्याने काहीजण नाक-तोंड पिळतात.
पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. टाकळा, करटोली,कोहळू, लोथ, अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत.
१} करटोली
करटोली किंवा कंटोळा ही भाजी डोंगराळ भागात आढळते. कारल्यासारखी दिसणारी छोटी छोटी ‘फळं’ अतिशय औषधी आहेत. क्रोनिक हेडेक दूर करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी करटोली गुणकारी आहेत. या फळभाजीमध्ये खूप बिया असतात. फायबरचे प्रमाण अधिक असून कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
२} टाकळा
ही भाजी पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला व उघडय़ा माळरानावर सहज आढळून येते. उग्र वास असलेली ही भाजी ‘अ’ जीवनसत्त्वाची परिपूर्ण आहे. दिसायला साधारण मेथीसारखी असणारीही पालेभाजी खूपच गुणकारी आहे. पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला आदी विकारांवर पानाचा रस मधातून घेतल्यास आराम पडतो. टाळक्याच्या पानांचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. या भाजीला ‘तखटा’ असेही म्हणतात.
३} आघाडा
ही वनस्पती ओसाड जमिनीवर, जंगलात आणि शेतात आढळते. या वनस्पतीची मुळे, पाने, फळे औषधात वापरतात. याच्या सेवनाने लघवी साफ होण्यास मदत होते, या भाजीमुळे हाडे मजबूत होऊन अंगातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. वात, हृद्यरोग, मूळव्याध, मुतखडा या आजारांवर गुणकारी असून पचनशक्ती सुधारते.
४} गुळवेल
ही भाजी झाडांवर अथवा कुंपणावर असतात. याला अमृतवेल, अमृतवल्ली या नावाने देखील ओळखले जाते. गुळवेल खाल्ल्याने भूक वाढते आणि पचनक्रिया सुधारते. मधुमेहासाठी फायदेशीर असून कावीळमध्ये भाजीचे सेवन करावे.
५} काटेमाठ
ही भाजी पावसाळ्यात ओसाड जमिनीवर किंवा रस्त्याच्या कडेली या भाज्या वाढतात. या वनस्पतीला सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये फुले येतात. बाळंतिणीच्या जेवणात या भाजीचा समावेश केल्यास अंगावरील दूध वाढण्यास मदत होते. तसेच गर्भपात होण्याचे टळते आणि गर्भाचे नीट पोषण होते. पित्त, मूळव्याध, रक्तविकार यावर गुणकारी असून पचण्यास हलकी असल्याने पचनक्रिया सुधारते.
संदर्भ:- आयुर्पाठ, राधेश बादले पाटील पंढरपूर जि सोलापूर