हॅलो कृषी ऑनलाईन : “गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीमुळे (Unseasonal Rain) शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके खराब (Unseasonal Rain) झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून, 3 हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे
राज्यातील अवकाळी पाऊस आणि नुकसानीबाबत (Unseasonal Rain) आज (ता.29) मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
पालकमंत्र्यांना सूचना (Unseasonal Rain In Maharashtra)
अवकाळीग्रस्त भागाला संबंधित सर्व पालकमंत्री भेट देतील तशा सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. यापूर्वी जेव्हा अवकाळी गारपिटीमुळे नुकसान झाले तेव्हा सरकारने मदत केली आहे. सर्व पंचनाम्याचा अंदाज घेतल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.
बुधवारी झालेल्या बैठकीत मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबतच्या नुकसानीबाबतचे सादरीकरण केले. पंचनामे प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ सरकारकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन) विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना कालच दिल्याचे यावेळी मदत व पुनर्वसन खात्याकडून सांगण्यात आले.