हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा २०२३ या वर्षात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अशातच लातूर जिल्ह्यात रात्रभर अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. रात्रभर सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत सुरू असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कायम
राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह धुमशान माचावलं आहे. याचा परिणाम राज्यातील शेती पिकांवर होताना दिसतो. यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडू लागलं आहे. मागील काही दिवसात अधूनमधून का होईना अवकाळी पाऊस सक्रिय असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचप्रमाणे लातुरात वीज पडून एका अकरा वर्षीय मुलीचा अपघात झाल्याचं पहायला मिळतंय. त्याचप्रमाणे जनावरे देखील मृत्युमुखी पडली आहेत.
वीज पडून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू
लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काही भागात जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच वीज कोसळून एका ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात भीतीचं वातावरण आहे. आरुषा नथुराम राठोड (वय ११ वर्ष, रा. मुबारकपूर तांडा, ता. निलंगा) असे मृत मुलीचे नाव आहे. आरुषा नथुराम राठोड ही मुलगी शेतात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेलेली होती. मात्र, अचानक तिच्या अंगावर वीज कोसळल्यानं तिचा मृत्यू झाला