हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल दिवसभर पावसाने (Weather Update) जोरदार हजेरी लावली. नदी, नाले, ओढे यांच्या पाण्याची पातळी वाढली असून पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. शिवाय नाशिकमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून आज पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज राज्यात काही ठिकाणी पावसाची उघडीप (Weather Update) तर काही ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाडा मध्ये विजांसह पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याला पावसासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे तर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदी आणि भंडारा या जिल्ह्यांना देखील हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, कोकणात बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी झाला. पालघर जिल्ह्यातील तालसरी येथे १०० मिलिमीटर पाऊस (Weather Update) झाला. तर डहाणू, जव्हार, वाडा येथेही मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. रायगड जिल्ह्यातही पाऊस कमी झाला. माथेरान येथे सर्वाधिक ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.