हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, राज्यातल्या काही भागात पावसाने (Weather Update ) उघडीप दिली आहे. तर काहीच भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळतो आहे. आज सकाळी रडार द्वारे नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मुंबई, ठाणे, पालघर भागात हलक्या सारी बरसत आहेत. तर आज रत्नागिरी, पुणे, सातारा आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचाही शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाचे तज्ञ् के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
हवामान स्थिती
मॉन्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास (Weather Update ) सुरू केला आहे. मंगळवारी (ता. २०) राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे. बुधवारी (ता. २१) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरापासून उत्तर पंजाबपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
आज या भागाला यलो अलर्ट
दरम्यान आज दिनांक २२ रोजी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच यलो अलर्ट (Weather Update ) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.