हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील वातावरणातील बदल (Weather Update) कायम असून, आता पुन्हा एकदा राज्यातील काही भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती कायम असून, त्या ठिकाणी अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळतोय. हीच चक्रीय वाऱ्यांची स्थिती बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल ते भुवनेश्वर, विशाखापट्टणम किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्टयात रूपांतरित झाली आहे. ज्यामुळे राज्यातील विदर्भ-मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा प्रवेश होऊन, पुढचा संपूर्ण आठवडा या भागात भाग बदलत पाऊस होणार (Weather Update) असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती (Weather Update Today 22 February 2024)
सध्याच्या घडीच्या राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका (Weather Update) जाणवतो आहे. मात्र, पुढील दोन दिवसानंतर राज्यातील वातावरणात संपूर्णतः बदल होऊन काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे. बंगालच्या उपसागरात पूर्व किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्यांचे कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. ज्यामुळे पुढील दोन दिवसात बंगालच्या उपसागरातून आर्द्रतायुक्त वारे तेलंगणा, दक्षिण कर्नाटकमार्गे राज्यातील विदर्भ मराठवाड्यातील भागांमध्ये पोहचतील. ज्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पाहायला मिळणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
उत्तरेकडे पावसाचे वातावरण कायम
दरम्यान, असे असतानाच देशाच्या वायव्य भागातून प्रवेश केलेल्या चक्रीय वाऱ्यांच्या झोताचा प्रभाव उत्तर भारतीय राज्यांमध्ये कायम आहे. या चक्रीय वाऱ्यांच्या झोतामुळे पुढील चार ते पाच दिवस पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह आसपासच्या भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
तापमानात चढ-उतार सुरूच
अशातच राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यातील धुळे या ठिकाणी 9.4 अंश सेल्सिअस निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 13.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. याशिवाय मागील 24 तासांमध्ये राज्यातील कमाल तापमानात काहीशी वाढ होऊन, सोलापुर या ठिकाणी उच्चांकी 37.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर धुळे, मालेगाव (नाशिक), सांगली, परभणी, अकोला, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 35 अंशाहून अधिक आहे.