हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल पावसाने (Weather Update) हजेरी लावली. विशेषतः: संध्याकाळनंतर आलेलया पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली त्यामुळे काढणीला आले सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. शेतशिवारात पाणी साठले आहे. आज ( ३०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
५-१० ऑक्टोबर दरम्यान मान्सूनची राज्यातून माघार
मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणासह संपूर्ण पंजाब आणि चंदिगडमधून मान्सून (Weather Update) माघारी माघारी परतला आहे. तसेच राजधानी दिल्लीतून देखील मान्सून माघारी फिरला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर महाराष्ट्रातून पाच ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
हवामान स्थिती
सध्या देशात मान्सून माघारी फिरण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच परतला आहे. अशातच, आता जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.
आज या भागाला यलो अलर्ट
दरम्यान आज कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यमहाराष्ट्रातील धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर या भागात विजांसह पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता असून या भागाला आज (३०) हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.