हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान निर्माण झाले असून उद्या दिनांक (९) पासून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज (Weather Update) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हा परिणाम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान राज्यातील थंडी गायब झाली असून तापमानात वाढ झाली आहे. मागच्या २४ तासात राजस्थानातील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गडचिरोली येथे राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३५.५ अंश तापमान नोंदले गेले.
या भागात हलक्या पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात (Weather Update) ढगाळ वातावरण आहे. उद्यापासून कोकण, तर शनिवारपासून (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर रविवारपासून (ता. ११) विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान स्थिती (Weather Update)
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ही प्रणाली कारईकलपासून पूर्वेकडे ६७० किलोमीटर, तसेच चेन्नईपासून ७५० किलोमीटर आग्नेयेकडे होती.बुधवारी (ता. ७) रात्री या प्रणालीचे ‘मनडुस’ चक्रीवादळात रूपांतर झाले. आज (ता. ८) सकाळपर्यंत ही वादळी प्रणाली उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकणार आहे. पूर्व किनाऱ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.