हॅलो कृषी ऑनलाईन : म्यानमारच्या किनारी भागात डिप्रेशन कायम आहे. ते ईशान्य दिशेने पुढे सरकत राहील आणि लवकरच खोल कमी दाबाच्या क्षेत्रात बदलू शकेल. शेतकरी मित्रांनो राज्यातल्या काही भागांमध्ये उन्हाचा चटका तर काही भागांमध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. काल कोकणात काही भागांमध्ये पाऊस झाल्याची माहिती आहे. कणकवली सिंधुदुर्ग मध्ये पावसाने हजेरी लावली. दरम्यान आजही राज्यातल्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे
आज दिनांक 24 मार्च रोजी हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र ,कोकण आणि कर्नाटक किनारीचा काही भाग तसेच उत्तर केरळ तसेच मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागावर दाट ढग दाटलेले दिसून येत आहेत. त्यामुळे या भागात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर हवामान विभागाच्या नागपूर विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
अवकाळीचा पिकांना फटका
ऐन मार्च महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील रब्बी काढणी आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्वारी हरभरा या पिकांची काढणी वेगानं सुरू आहे. त्यामुळे आपला शेतमाल सुरक्षित जागी ठेवावा आणि योग्य वेळेत काढणी करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो आहे. या शिवाय कोकणात कालपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकांना फटका बसणार आहे. त्यामुळे सध्याचे आंब्याचे दर पाहता अद्यापही हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. यंदाच्या वर्षी बदलत्या हवामानामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. मध्यंतरी चाळीस अंशांपर्यंत गेलेल्या तापमानामुळे आंबा पिकाची फळ गळ होऊ लागले. तर आता अचानक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.