हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या गेल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान पिक विमा योजना होय. याची सुरुवात 2016 मध्ये करण्यात आली होती. या योजनेबाबत बोलताना शुक्रवारी केंद्रीय कृषी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत देशातील विविध राज्याच्या सरकार द्वारे वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची देखील या योजनेमध्ये समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे वन्य प्राण्यापासून शेती पिकानाचे नुकसान झाल्यास त्याचा मोबदला सरकारकडून मिळण्याची शक्यता आहे.
कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत राज्य सरकारद्वारे अधिसूचित शेतीसाठी पेरणीपासून ते काढणीपर्यंत पिकांना संरक्षण देण्यासाठी विमा सुरक्षा देते. तसेच ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने विविध राज्यांना आपल्या स्वतःच्या खर्चातुन राज्याची आवश्यकता लक्षात घेता व्यक्तिगत मूल्यांकनावर जंगली जनावरांपासून होणारे नुकसान वैयक्तिक मूल्यमापनावर अधिसूचित करण्याची परवानगी दिली असल्याची माहितीही कृषी कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.
महाराष्ट्राचा विचार करता अनेकदा ऊस, भुईमूग, यासह इतर पिकांमध्ये हत्ती , गवा, रानडुक्करे यांच्या त्रासामुळे उभे पीक नष्ट होऊन जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. मात्र आता अशा शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र केंद्रीय मंत्र्यांनी याचे अधिकार राज्य सरकारांकडे दिल्याचे सांगितले जाते आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.