हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतीये. मात्र शेतीपयोगी जमिनीचे (Agri Business) प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीपूरक असलेले दुग्धव्यवसाय व मत्स्य उत्पादनाकडे विशेष लक्ष (Agri Business) द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केले आहे. नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ येथे राज्यपालांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
तळागाळात जाऊन काम करावे (Agri Business Work at grassroots level)
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अधिष्ठाता डॉ शिरीष उपाध्याय, दुग्धव्यवसाय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक, विस्तार व शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाणे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. आरजू सोमकुंवर, पशु, प्रजनन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिलीप रघूवंशी आदी उपस्थित होते. अन्नधान्याच्या बाबतीत देश आत्मनिर्भर झाला असून, श्वेतक्रांतीतून दुधाचे उत्पादन वाढले आहे. मात्र असे असले तरी आज जास्तीत जास्त शेतजमिनीचा उपयोग करून शेतक-यांचे उत्पन्न कसे वाढविता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुंसह इतर अधिष्ठाता व प्राध्यापकांनी गावागावात पोहचून शेतक-यांना मार्गदर्शन करावे. केवळ विद्यापीठाच्या दैनंदिन कामापुरते मर्यादीत राहू नये. तळागाळात जाऊन शेतक-यांच्या समस्या समजून त्यांचे निराकरण करावे. असेही राज्यपाल बैस यावेळी म्हणाले आहे.
मत्स्य उत्पादनावर भर द्यावा
गोड्या पाण्यातील माशांची मोठी मागणी आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी आजची परिस्थती आहे. विदर्भातील जमीन ही उंच-सखल आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी अडवून त्यात मत्स्य उत्पादन करणे शक्य आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत शेतक-यांना मत्स्य उत्पादनासाठी मत्स्यबीज, बोटूकली आदी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही राज्यपाल बैस यांनी केल्या आहेत.
कृत्रिम परिवेक्षीय निषेचन प्रयोगशाळेला भेट
राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालयातील भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञान आणि कृत्रिम परिवेक्षीय निषेचन प्रयोगशाळेला भेट दिली. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून दुग्ध उत्पादनाची उच्च अनुवांशिकता असलेल्या साहिवाल, गीर, गवळाऊ, डांगी आणि देवणी या देशी गोवंशाच्या गायीचे पुनरुत्पादन केले जात आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत कार्यरत भ्रुण प्रत्यारोपण प्रयोगशाळेमार्फत भ्रुण प्रत्यारोपणाचे यशस्वी प्रयोग करण्यात येत असून एकूण 31 गायींमध्ये आयव्हीएफ म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीद्वारे गर्भधारणा झाली असून एकूण 23 निरोगी सुदृढ वासरे जन्माला आली आहे. अशी माहिती विद्यापीठाकडून राज्यपालांना देण्यात आली.