हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कृषी उत्पादक राज्य असून, यंदा राज्यातील सर्वच पिकांच्या उत्पादनात (Agriculture Production) मोठी घट होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कापूस, ऊस आणि कांदा या खरीप पिकांच्या उत्पादनास (Agriculture Production) पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कापूस, तूर आणि साखर उत्पादनात घट होणार असल्याची अनेक संस्थांची आकडेवारी याआधीच समोर आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांमध्ये यावर्षीच्या खरीप हंगामात सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरिपातील प्रमुख पीक असलेलया कापूस, सोयाबीन, तूर यासह अन्य कडधान्यांच्या उत्पादनावर याचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी या पिकांच्या उत्पादनात निम्म्याने घट नोंदवली गेली आहे. तर बारमाही पीक असलेल्या ऊस पिकालाही पावसाअभावी मोठा फटका आहे. त्यामुळे राज्यातील साखरीचा गोडवा कमी होणार आहे. याबाबत भारतीय साखर महामंडळाकडून नुकतीच साखर उत्पादनातील घटीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर भारतीय कापूस महामंडळाकडूनही कापूस उत्पादनातील घटीची आकडेवारी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केली आहे.
कांदा बियाणे माघारी (Agriculture Production In Maharashtra)
दरम्यान, दिवाळीपूर्वी दरवाढीसह कांदा पिकाचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक नाशिक जिल्ह्यात दाखल झाले होते. यावेळी कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाल्याचे निरीक्षण केंद्राच्या या समितीने नोंदवले होते. तर मागील 6 ते 7 वर्षात प्रथमच अनेक कंपन्यांच्या कांदा बियाण्याच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे सांगितले जात आहे. विक्रीअभावी कृषी सेवा केंद्रांनी बियाणे माघारी पाठवल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादनात मोठी घट होऊ शकते, हे अधोरेखित झाले आहे.
रब्बीलाही फटका
तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या धरणसाठ्याच्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीत महाराष्ट्रातील पाण्याच्या पातळीत 20 टक्क्यांनी घट झाली असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. ज्याचा सध्या राज्यातील रब्बीच्या पेरणीवरही परिणाम दिसून येत आहे. यात प्रामुख्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील रब्बीच्या पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा राज्यातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या हरभरा लागवडीखालील क्षेत्रात जवळपास 10 ते 15 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. तर गव्हासह अन्य रब्बी पिकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे.