हॅलो कृषी ऑनलाईन : देशात लोकसंख्येची सातत्याने वाढ होत असतानाच, शेती क्षेत्राला (Agriculture University) मात्र हवामान बदलाचा फटका बसत आहे. परिणामी, आगामी काळात हवामान बदलआधारित शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठांनी शेती क्षेत्रातील आगामी काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आतापासून त्या दिशेने प्रयत्न सुरु करावेत. असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे. ते अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (Agriculture University) 38 व्या पदवीप्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते.
शेतीत सुधारणेला वाव (Agriculture University Works On Climate Change)
देशात शेती क्षेत्रामध्ये सुधारणेला मोठा वाव असून, कुशल मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे. याशिवाय शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीबाबत अधिकची माहिती आहे. यालाच जोड देत कृषी विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या पदवीधर तरुणांनी शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी. आणि त्याही पुढे जाऊन देशाला जगाचे ‘अन्नधान्याचे कोठार’ बनवावे. असे आवाहन त्यांनी यावेळी पदवीधरांना केले आहे.
स्टार्टअप्स सुरु करावेत
मागील दशकभरात देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. याशिवाय सध्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आधारित शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे नवयुवक पदवीधरांना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी अन्नप्रक्रिया क्षेत्रात स्टार्टअप्स सुरु करावेत. यात मोठा वाव आहे. त्यामुळे फलोत्पादन व फुलशेती उद्योगाला चालना मिळेल, असेही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३८ व्या पदवीप्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे देखील दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. याशिवाय गुजरात येथील नवसारी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. झेड पी पटेल, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, राज्यातील अन्य विद्यापीठांचे कुलगुरु देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ४०४० कृषी पदवीधरांना पदवी प्रदान करण्यात आली. तर ७९ पदवीधरांना सुवर्ण व रौप्य पदके तसेच रोख पारितोषिके देण्यात आली.