Ajit Pawar : सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने पाठ फिरवली असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात पाण्याबाबत गंभीर परिस्थिती असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. परभणीतील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी यासंदर्भात वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर सध्या पाण्याची परिस्थिती पाहता सरकार पाण्याचे नियोजन करत असल्याचे देखील अजित पवार म्हणाले आहेत. (Ajit Pawar)
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – अजित पवार
मागच्या काही दिवसापासून राज्यात पाऊस पडत नाही. यामुळे शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत काही ठिकाणी तर शेतकऱ्यांची पिके नष्ट देखील झाले आहेत. मात्र अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आताच काय उपाययोजना करता येईल याचा आढावा घेण्यात आला आहे. असं देखील अजित पवार म्हणाले आहेत
दरम्यान, यंदाच्या वर्षी परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची खूप तूट आहे. अनेक प्रकल्पात पाणीसाठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मी घाबरवत नाही पण परिस्थिती सध्याची खूप गंभीर आहे. आम्ही सर्व परिस्थितीचा आढावा घेतोय त्याचबरोबर पाणीसाठा लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे, सध्या बळीराजाला मदतीची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ठोस मदत करण्याचा प्रयत्न आमच्याकडून करण्यात येत आहे. सध्याची पाण्याबाबत परिस्थिती पाहता गाफील राहता कामा नये. पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना न्याय दिला’
महाराष्ट्राला संत महात्मा यांची परंपरा लाभलेली असून त्यांच्याच विचारांच्या मार्गाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जात आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करोडो लोकांना आपण न्याय दिला आहे. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये चकरा मारायची गरज नाही. त्यामुळे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला अजून सर्वांनी भरभरून साथ द्यावी असं अजित पवार म्हणाले आहेत.