हॅलो कृषी | साखर कारखान्यांमध्ये निघणाऱ्या प्रेसमड’मधून सीएनजी गॅस निर्मितीबाबत प्रस्ताव आला असून, रोहतक येथे असा एक प्लांट उभारला गेला आहे. यामधून चांगल्या प्रकारे उत्पन्न निघून, त्यातून कारखानदारी व्यवसाय आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळवून देता येऊ शकतो. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिली. राज्यातील साखर उत्पादन आणि साखर कारखानदारी संदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीमध्ये, साखर उत्पादन साखर उद्योगासमोरील समस्या, साखरेची विक्री, साखर कारखान्याच्या उत्पादन वाढीच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना दिली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हेही या बैठकीसाठी उपस्थित होते.
सध्या साखर विक्री होत नसून साखरेला जास्त उठाव नाही. व्यापारी साखर खरेदीसाठी येत नाहीत. यामुळे, साखर कारखान्यांचे उत्पन्न कमी झाले असून ते कसे वाढवता येईल, या संदर्भात चर्चा झाली. साखर कारखान्यांची गोदामे आहेत, त्यावर सोलर पॅनल बसवून यासंदर्भात चर्चा होऊन, कंपन्यांनी गोदामे बांधून देऊन त्यावर 25 वर्षासाठी सोलर पॅनल बसवण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सोबतच, को-जनरेशन प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती, डिस्टीलरी प्रकल्प, इथेनॉल तयार करण्यात येऊ लागलं आहे. त्यामुळे, यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न होत आहे. यामुळे इंडस्ट्री टिकून सोबतच, शेतकऱ्यांनाही दोन पैसे अधिक मिळतील यासाठी चर्चा करण्यात आली. अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांना दिली.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा