हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यापासून राज्यातल्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. तर अद्यापदेखील अनेक भागात वातावरण ढगाळ होते आहे. याचा परिणाम शेती पिके आणि फळबागांवर झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
फळबागेचे व्यवस्थापन
१) संत्रा – मोसंबी : संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे संत्रा/मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी.
२) डाळिंब : डाळींब बागेत अंबे बहाराच्या नियोजनासाठी जमिनीच्या प्रकारानूसार तिन ते सहा आठवडे बागेस पाणी देणे बंद करावे (बागेस ताण द्यावा). काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.