Drought : दुष्काळ पडावा ही तर शेतकऱ्यांचीच इच्छा; सहकारमंत्री बरळले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांची इच्छा असते की वारंवार दुष्काळ (Drought) पडावा, कारण त्यामुळे त्यांना सरकारकडून कर्जमाफीचा लाभ मिळतो. असे वादग्रस्त विधान कर्नाटक सरकारमधील सहकार व पणनमंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस शासित सरकार असून, भारतीय जनता पक्षाने पाटील यांच्या या विधानाला असंवेदशीलतेचे आणि बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटले आहे. पाटील यांच्या या विधानावर कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून (Drought) रोष व्यक्त केला जात आहे.

काय म्हणाले शिवानंद पाटील? (Farmers Desires For Drought)

शिवानंद पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. ते म्हणाले आहेत की, “शेतकऱ्यांना कृष्णा नदीचे पाणी मोफत मिळते, वीजही मोफत आहे. येदियुरप्पा, एचडी कुमारस्वामी, सिद्धारमैया अशा अनेक मुख्यमंत्र्यांनी मोफत बी-बियाणे दिले. शेतकऱ्यांच्या मनात केवळ एकच प्रार्थना असते, कर्जमाफीसाठी वर्षानुवर्षे दुष्काळ पडावा. ज्यामुळे त्यांना कर्जमाफी मिळते.”

माफी मागण्याची मागणी

एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी खुलेपणाने हे विधान केल्याने शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर हल्ला चढवला आहे. पाटील यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर उध्दट भाष्य केले होते. त्याची आठवण करून देत शिवानंद पाटील यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी कर्नाटक बीजेपीकडून करण्यात आली आहे.

कर्नाटक बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येदियुरप्पा यांनी पाटील यांच्यावर हल्ला चढवत म्हटले आहे की, “राज्यातील काँग्रेस सरकार वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करत आहे. शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे हीच संस्कृती काँग्रेस सरकारने आत्मसात केली आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस सरकारने मंत्री शिवानंद पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. राज्यातील काँग्रेस सरकार असंवेदशील सरकार असून, शिवानंद पाटिल यांनी तात्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी. “

error: Content is protected !!